तळेगाव दशासर | प्रतिनिधी
तळेगाव दशासर येथील भवानी माता मंदिर परिसरातील कथित वृक्षतोड प्रकरणात अखेर वनविभागाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. ग्रामस्थांनी लेखी तक्रार व निवेदन दिल्यानंतर तब्बल १२ दिवसांनी ही कारवाई झाल्याने नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी संबंधितांवर कारवाईची मागणी करत वनविभागाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, तक्रारीनंतरही तत्काळ हालचाल न झाल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
अखेर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली आणि पंचनामा केला. या पंचनाम्याच्या आधारे पुढील चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
आता या प्रकरणात दोषींवर ठोस कारवाई होणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले असून वनविभागाच्या पुढील भूमिकेबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे.


