परिवर्तनाची घाई नको; परिवर्तनाची प्रक्रिया समजून घ्या! — प्रफुल्ल मंदा श्रीधर
आजकाल समाजकार्यात एक विचित्र प्रवृत्ती वाढताना दिसते. एखादा सामाजिक उपक्रम झाला, जनजागृती मोहीम राबवली, व्याख्यान झाले किंवा एखादी चळवळ सुरू झाली की, काही जण लगेच प्रश्न विचारतात— "काय झाले? किती लोक बदलले? समाजात काय फरक पडला?" जणू काही एका दिवसात संपूर्ण समाज बदलला पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असते.
ही अपेक्षा ना वास्तववादी आहे, ना समाजपरिवर्तनाच्या इतिहासाशी सुसंगत आहे.
समाजपरिवर्तन हा एका दिवसाचा कार्यक्रम नसतो; ती एक अखंड चालणारी प्रक्रिया असते. एका व्याख्यानाने, एका बैठकीने, एका मोर्चाने किंवा एका मोहिमेने संपूर्ण समाज बदलत नाही. मात्र त्या माध्यमातून विचारांचे बीज पेरले जाते. त्या बीजाला अंकुर फुटण्यासाठी वेळ लागतो, त्याचे रोपटे वाढण्यासाठी सातत्य लागते आणि त्याचे वृक्षात रूपांतर होण्यासाठी अनेक हातांचे श्रम लागतात.
महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, गाडगेबाबा, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांसारख्या समाजसुधारकांनी एका दिवसात परिवर्तन घडवले नव्हते. त्यांनी वर्षानुवर्षे संघर्ष केला, विरोध सहन केला, लोकांमध्ये जाऊन संवाद साधला आणि सातत्याने काम केले. त्यानंतर समाजात बदल घडत गेला.
आज काही जुने, अनुभवी आणि जाणते कार्यकर्तेही कधी कधी अशा प्रकारच्या तात्काळ परिवर्तनाच्या अपेक्षा व्यक्त करतात. त्याहून आश्चर्य म्हणजे, प्रत्यक्ष समाजात न जाता केवळ घरबसल्या ऑनलाइन पोस्ट, प्रतिक्रिया आणि टीका करून स्वतःला चळवळीचे नेते समजणारे काही जणही इतरांच्या कार्याचे मूल्यमापन करतात. ही प्रवृत्ती समाजकार्यासाठी पोषक नाही.
एक क्षण स्वतःकडेही पाहण्याची गरज आहे. आपल्या कार्यकाळात आपण केलेल्या प्रत्येक कार्यक्रमानंतर लगेच समाज बदलला होता का? प्रत्येक जनजागृती मोहिमेचा परिणाम दुसऱ्याच दिवशी दिसला होता का? जर उत्तर "नाही" असेल, तर आज इतरांकडून अशा अवास्तव अपेक्षा ठेवणे योग्य कसे ठरेल?
खरी चळवळ सोशल मीडियावर नव्हे, तर समाजाच्या रस्त्यावर, वस्त्यांमध्ये, गावांमध्ये, शाळांमध्ये, शेतात, कारखान्यांमध्ये आणि लोकांच्या आयुष्यात उभी राहते. समाजकार्यासाठी पोस्टपेक्षा पायपीट, प्रतिक्रियेपेक्षा प्रत्यक्ष कृती आणि टीकेपेक्षा सहभाग अधिक महत्त्वाचा असतो.
समाज बदलण्यासाठी संयम लागतो. विश्वास निर्माण करावा लागतो. लोकांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात. संवाद साधावा लागतो. पुन्हा पुन्हा त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागते. तेव्हाच विचार कृतीत उतरतात आणि परिवर्तनाची दिशा तयार होते.
म्हणून एखाद्या कार्यक्रमानंतर लगेच "काय बदल झाला?" हा प्रश्न विचारण्यापेक्षा, "हा बदल अधिक व्यापक कसा होईल?", "या प्रयत्नांना आपण काय हातभार लावू शकतो?" हा प्रश्न विचारणे अधिक विधायक ठरेल.
समाजपरिवर्तन ही शर्यत नाही; तो एक प्रवास आहे. या प्रवासात प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न महत्त्वाचा असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याऐवजी त्यांना बळ द्या, विधायक सूचना द्या आणि शक्य असेल तेथे स्वतःही कृतीत सहभागी व्हा.
लक्षात ठेवा, परिवर्तन एका दिवसात घडत नाही; पण एका दिवसाची प्रामाणिक सुरुवात भविष्यातील परिवर्तनाचा पाया नक्कीच घालते. समाज बदलण्यासाठी घोषणांपेक्षा कृती, प्रसिद्धीपेक्षा प्रामाणिकपणा आणि अपेक्षेपेक्षा सातत्य अधिक आवश्यक असते.
"टीका करणारे अनेक भेटतील; पण परिवर्तन घडवणारे हात फार थोडे असतात. म्हणून टीकेपेक्षा कृतीला, अपेक्षेपेक्षा सातत्याला आणि शब्दांपेक्षा कार्याला अधिक महत्त्व देऊया."
– प्रफुल्ल मंदा श्रीधर
जिल्हाकार्याध्यक्ष
महा. अनिस अमरावती तथा विभागीय समन्वयक सृजन मराठी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य.

