नेरपिंगळाई येथील शेतकऱ्याची आत्महत्या..!

 

अमरावती,मोर्शी : तालुक्यातील नेरपिंगळाई येथील एका ५२ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २० जानेवारी रोजी पहाटे ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्रकाश भगवंतराव पोटे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

प्रकाश पोटे या शेतकऱ्याकडे शिरलस शिवारात तीन एकर शेती आहे. पेरणी करण्यासाठी सेवा सहकारी सोसायटीचे २ लाख रुपये व ट्रॅक्टर घेण्यासाठी बँकेतून १० लाखाचे कर्ज घेतले होते. यामधून त्यांनी शेतात सोयाबीन व कपाशीची पेरणी केली होती. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे सोयाबीन पिकाला शेंगाच आल्या नसल्यामुळे शेतातच सोयाबीनवर रोटाव्हेटर फिरवून पीक नष्ट करण्यात आले.



नगदी असलेले कपाशीचे पीकसुद्धा हातातून गेले. त्यामुळे ट्रॅक्टरची किस्त कशी फेडायची व मुलांचे शिक्षण या विवंचनेत ते राहत होते. दरम्यान दि. १९ रोजी रात्री घरी सर्वांनी जेवण घेऊन सर्व मंडळी झोपी गेली. पहाटे ५ वाजता प्रकाशने घरातील लोखंडी पोलला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. त्यांची मुलगी सकाळी ६ वाजता उठली असता तिचे वडील प्रकाश हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेची माहिती शिरखेड पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार मनोज कळसकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला तर तलाठी मनोहरे व कोतवाल राजेश मोहोकार यांनी तहसीलदार यांच्या कडे शेतकरी आत्महत्येची माहिती दिली यावेळी ग्रामसेवक विनोद मनवर उपस्थित होते मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे रवाना करण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.  याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.




Post a Comment

Previous Post Next Post