जनता दरबार भरवून नागरिकाच्या समस्या सोडवणारा आमदार हवा - बबन वानखेडे सामाजिक कार्यकर्ते
विशेष प्रतिनिधी /अनिल बंगाळे
किनवट प्रतिनिधी : नोकरशाही कमालीची मुजोर झाली असून त्यांच्यावर कुणाचाही वचक राहिलेला नाही. केंद्र व राज्य सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून शासनाकडून विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जातात परंतु झारीतील शुक्राचार्य असलेल्या नोकरशाही कडून सामान्य नागरिकांना शासकीय कामासाठी नियमावर बोट ठेवून व नसलेल्या त्रुटी काढून हेलपाटे मारायला लावून त्यांना जेरीस आणून सोडल्या जाते व कामाची टाळाटाळ करून शेवटी खुलेआम काम करून देण्यासाठी पैशाची मागणी केली जाते. संबंधित कर्मचाऱ्याची एखाद्या नागरिकांनी वरिष्ठाकडे तक्रार केली तरी वरिष्ठाकडून योग्य ती दखल न घेतली गेल्याने मुजोर कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढत आहे. राज्यातील अनेक आमदार, खासदार यांच्याकडून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार भरवला जातो. त्यामध्ये त्या त्या विभागाचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित असतात. त्यामुळे नागरिकांच्या समस्या समोरा समोर सांगून त्यावर उपाय योजनाही सांगितल्या जातात. पण दुर्दैवाने आपल्या किनवट माहूर तालुक्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या लोकप्रतिनिधीची नितांत गरज असून भविष्यात लोकप्रतिनिधी यांनी नियमित जनता दरबार भरून नागरिकांच्या प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्यात याव्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बबन वानखेडे यांनी केली आहे.
किमान महिन्यातून दोनदा जनता दरबार भरवून लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे व होत असलेल्या विकास कामाचा नागरिका समवेत आढावा घेण्यात यावा. यामुळे निर्धवलेली नोकरशाही समोरासमोर समस्या ऐकून घेतल्याने निश्चितच सुता सारखे सरळ झाल्याशिवाय राहणार नाही. पण लोकप्रतिनिधींना सर्वसामान्य लोकांच्या समस्याचे काही सोयर सुतक नसल्याने नोकरशाचे फावल्या जात आहे त्यातच दोन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यामुळे जवळपास सर्वच विभागात प्रशासक राज चालू आहे. त्यामुळे नोकरशहाची मुजोरी जास्तीच वाढलेली आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू असून नागरिकांनी मतदानाची मागणी करायला येणाऱ्या उमेदवाराकडे निवडून आल्यानंतर जनता दरबार भरून सामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणार का असा जाब उमेदवारांना जरूर विचारावा असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते बबन वानखेडे यांनी केले आहे..