सारखणी/माहूर : माहूर व किनवट तालुक्यासह मराठवाड्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकांचे नुकसान झाले असून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने बुधवार, २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सारखणी येथे किनवट-माहूर मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व कर्जमाफी द्यावी, पीकविमा तात्काळ जमा करावा, चारा छावण्या व टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, वीज बिल माफ करावे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, रोजगार हमीची कामे सुरू करावीत तसेच प्रलंबित पीक कर्जाचे वाटप करावे, अशा मागण्या किसान सभेने केल्या आहेत.
या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अर्जुन आडे, सहसचिव कॉ. शंकर सिडाम, जिल्हा सचिव कॉ. किशोर पवार यांच्यासह पदाधिकारी व नेते करणार आहेत. शेतकरी व शेतमजुरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

