प. पू. प. म. श्री मधुकरबाबा शास्त्री कवीश्वर यांचे प्रतिपादन
श्रीक्षेत्र माहूर : महानुभाव पंथाचे महास्थान असलेल्या श्रीदेवदेवेश्वर मंदिरात दि. 12 सप्टेंबर रोजी महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची 806 वी जयंती भक्तीभावात व उल्हासात साजरी करण्यात आली.
यावेळी आयोजित धर्मसभेत मार्गदर्शन करतांना माहूर पिठाधीश प. पू. प. म. श्री मधुकरबाबा शास्त्री कवीश्वर यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 800 वर्षांपूर्वी विश्वकल्याणकारी मूल्ये समाजात रुजविली,असे प्रतिपादन केले.
यावेळी धर्मसभेच्या अध्यक्षस्थानी प. पू. प. म. श्री मुरारीमल्ल बाबा पाचराऊत हे होते, तर प. पू. प. म. श्री शहागडकर बाबा, प. पू. प. म. श्री संन्यासी बाबा,प. पू. श्री वी. भो. अमृते बाबा, प. पू. श्री कृष्णराज बाबा, प. पू. वैद्यराज बाबा, प. पू. श्री योगीराज बाबा व प. पू. श्री प्रदीपराजदादा पंजाबी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.संस्थानचे वतीने सर्व विद्वत संत- महंतांचा शाल, श्रीफळ व पुष्पहाराने सन्मान करण्यात आला पुढे बोलतांना पूजनीय महंत मधुकरबाबा शास्त्री म्हणाले की, वर्णव्यवस्थेच्या बंधनात समाज जखडलेला असतांना श्री चक्रधर स्वामी यांनी महाराष्ट्राला कर्मभूमी मानून समता, बंधुता, न्याय, अहिंसा आणि मानवतेवर आधारित नवमतांचा पुरस्कार केला. तसेच स्त्री-पुरुष समानता, सर्वांना शिक्षण, अस्पृश्यता निवारण, भूतदया, पर्यावरण संरक्षण, सामाजिक सौहार्द, बुद्धी प्रामाण्य, अंधश्रद्धा निर्मूलन असे महनीय कार्य करुन अवास्तव कर्मकांडाला विरोध केला.धर्मसभेत ई. श्री पार्थशास्त्री विद्वान्स, महंत वी. भो.अमृते, शाहीर दामोधर वजीरगावंकर, योगीराज बापू विद्वान्स व महंत मुरारीमल्ल बाबा यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले.यावेळी महानुभाव पंथीय संत, महंत, पुजारी व अनुयायी मोठ्या संख्येत उपस्थित होते. प्रास्ताविक ई. श्री छत्रपतीदादा कवीश्वर यांनी केले. सूत्रसंचलन प्रदीपदादा पंजाबी यांनी केले, तर आनंदराव गजभिये यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंडित पाटील केशवे, उत्तमराव पाटील सुकळकर, राजु पाटील सुकळकर, प्रेम पाटील सुकळकर, परमेश्वर सुरोशे, सुरेश कोथळकर,बंडू ठाकरे व छगन भालेराव यांनी परिश्रम घेतले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.


