घाटंजी शहरातून मानोलीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर काशी विश्वनाथ इमारतीजवळ रस्त्याच्या मधोमध मोठे भगदाड पडल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच ठिकाणी नगरपरिषदेकडून काही दिवसांपूर्वी बांधण्यात आलेला रपटा अल्पावधीतच फुटला असून, त्यामध्ये मोठे भोक पडले आहे. तसेच लोखंडी सळ्या उघड्या अवस्थेत दिसत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या उघड्या सळ्यांमध्ये पादचारी, लहान मुले तसेच दुचाकीस्वारांचा पाय अडकून गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे हे भगदाड पाण्याखाली झाकले जाण्याची शक्यता असून, त्यामुळे धोका आणखी वाढला आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाने या धोकादायक ठिकाणी तातडीने सुरक्षेची उपाययोजना करून दर्जेदार व कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने त्वरित कारवाई करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
"अपघात झाल्यानंतर नव्हे, तर अपघात टाळण्यासाठी आधीच उपाययोजना कराव्यात," अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.


