मुंबई |विशेष प्रतिनिधी सुनिल धुर्वे
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सन २०२५-२६ च्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत पीकविमा प्रश्नावर सभागृहात प्रभावीपणे आवाज उठविला.
यवतमाळ हा आत्महत्याग्रस्त जिल्हा असून, यावर्षी सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीतही जिल्ह्यातील अनेक पात्र शेतकरी पीकविमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी सभागृहात उपस्थित केला. यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला तातडीने पीकविमा योजनेचा लाभ मिळावा, अशी ठाम मागणी त्यांनी शासनाकडे केली.
यासोबतच, खराब CIBIL स्कोअरमुळे अनेक शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. शासनाने बँकांना लेखी सूचना देऊन अशा शेतकऱ्यांनाही पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, सन २०१८-१९ मध्ये पांढरकवडा येथे कृषी महाविद्यालय मंजूर करण्याचे देण्यात आलेले आश्वासन तातडीने पूर्ण करून कृषी महाविद्यालयास मंजुरी द्यावी, अशी विनंती त्यांनी माननीय कृषी मंत्र्यांकडे सभागृहात केली.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, त्यांच्या हितासाठी आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सातत्याने सभागृहात बुलंद आवाज उठवत राहणार असल्याचेही आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी स्पष्ट केले.
