धामणगाव रेल्वे,हिरपूर : 'गावाकडची बातमी'मध्ये हिरपूर गावातील मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेबाबत वृत्त प्रकाशित होताच स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले असून, मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनचालक, शालेय विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांनी सातत्याने याबाबत आवाज उठविल्यानंतर आणि 'गावाकडची बातमी'ने हा प्रश्न प्रकाशझोतात आणल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत कामाला सुरुवात केली.
सध्या खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, हे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून उर्वरित खराब रस्त्यांचीही तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामांना अनेक ठिकाणी गती मिळत असून, हिरपूरमध्येही त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
