चौराकुंड परिसरात ४ दिवसापासून बत्तीगुल-समस्या निकाली काढण्याची नागरिकांची मागणी...
विशेष प्रतिनिधी संतोष भालेराव
मेळघाट : धारणी पासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या घनदाट जंगलात वसलेल्या चौराकुंड, तांगडा, मालुर फॉरेस्ट, या गावांतील गेल्या चार ते पाच दिवसापासून वीज खंडित असल्याने या गावामधे अंधार पसरला आहे. तसेच या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
चौराकुंड हे गाव सिपना वन्यजीव विभागाअंतर्गत अति दुर्गम भागात वसलेले असून गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसामुळे या गावात वीज नसल्याने गावांमध्ये वन्यजीव घुसत असून गावकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. व वन्यजीवाच्या दहशतीत गावकरी जगत आहे. गेल्या आठवड्यात याच जंगलात हरिसाल येथील एका इसमाचे व काही गुरांचे वाघाने बळी घेतला होता. त्यामुळे केव्हा वाघ गावात येईल व हल्ला करेल हे सांगता येत नाही. म्हणून गावातील वीजपुरवठा त्वरित पूर्ववत करण्याची गावकऱ्यांनी मागणी केली आहे. नेमकं कुटून वीज खंडित होत आहे. याचा शोध घेणे गरजेचे असून त्यासाठी वीज वितरण कंपनीने कर्मचारी पाठवून विजेची समस्या निकाली काढावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रघुभाऊ खडके यांनी केले.