अमरावती : जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून काम करीत असताना विविध विभागातील उत्तम समन्वय आणि अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागला असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी व्यक्त केली.
जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा प्रशासनाच्या वतीने सौरभ कटियार यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी पद्मश्री शंकरबाबा पापळकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी संजीता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, जिल्हा पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आदी उपस्थित होते.
सौरभ कटियार म्हणाले, प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने जिल्हा अतिशय चांगला आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने मेळघाट हा अतिशय महत्वाचा भाग आहे. या भागाच्या विकासासाठी जिल्हाधिकारी म्हणून कार्य करताना नेहमीच चांगले काम करण्याचा दृष्टीकोन ठेवला. प्रत्येक कार्य करताना प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळाले. आदिवासी आणि जंगलाचा भाग असलेल्या जिल्ह्यात आरोग्य आणि ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रित येऊन कार्य केले. त्यामुळे राबविलेल्या प्रत्येक उपक्रमाला यश मिळाले.
जिल्हा प्रशासनात ई-ऑफीस आणि इतर महत्वपूर्ण उपक्रम राबवून लोकाभिमुख प्रशासन करण्यावर भर दिला. समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्यावरील उपाययोजना देऊन आश्वस्त केले. त्यामुळे सामाजिक संघटनांची प्रशासनाला चांगली साथ मिळाली. गेल्या वर्षातील दोन निवडणूकांमध्ये सर्व घटकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने मतदानाच्या टक्केवारीत विक्रमी वाढ झाली. समन्वय आणि सहकार्य मिळाल्याने प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत झाली. पीएम मित्रा, मेळघाट आणि अमरावती विमानतळावरून प्रवाशी सेवेचा शुभारंभ ही कार्यकाळातील महत्वाच्या नोंदी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पद्मश्री शंकरबाबा पापळकर, मुख्य कार्यकारी संजीता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, जिल्हा पोलिस अधिक्षक विशाल आनंद, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बयास, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, प्रसेनजित चव्हाण, तहसिलदार विजय लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, डॉ. विकास खंडारे, राजेश चौरपगार, विजेश वरतानी, कमल राठी, विवेक पिढेकर यांनी मनोगत व्यक्त करून सौरभ कटियार यांच्या कार्यकाळातील कार्याला उजाळा दिला. क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले.