मूर्तिजापूर - स्वच्छता अभियानच्या वतीने उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी एक सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. शहर पोलीस स्टेशन परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याच्या मातीच्या कुंड्या ठेवण्यात आल्या. या उपक्रमाचा शुभारंभ ठाणेदार अजित जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुंड्यांमध्ये पाणी भरून पक्ष्यांसाठी पाणवठा उपलब्ध करून देण्यात आला. यावेळी स्वच्छता अभियानचे प्रमुख सत्यनारायण तिवारी, विलास नसले, गजानन चव्हाण, विलास वानखडे, रोहित सोळंके, संतोष माने,दीपक खंडारे, चौबे जी,सुनील अग्रवाल, दिनेश श्रीवास, व तायडे सर , ओम जाधव,आदी पोलीस कर्मचारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वच्छता अभियान प्रमुख सत्यनारायण तिवारी यांनी सांगितले की, “उन्हाळ्यात झाडांची संख्या कमी होत चालली आहे, त्यामुळे पक्ष्यांना सावली व पाण्याची कमतरता भासत आहे. अशा वेळी नागरिकांनी आपल्या घराच्या गॅलरीत, टेरेसवर किंवा अंगणात पाण्याच्या कुंड्या ठेवाव्यात. हा उपक्रम केवळ कुंड्या ठेवण्यापुरता मर्यादित न ठेवता, त्यांचे नियमित व्यवस्थापन करणेही महत्त्वाचे आहे.ठाणेदार अजित जाधव यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, “स्वच्छता अभियानाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली ही पुढाकाराची भावना निश्चितच प्रेरणादायी आहे. पोलीस प्रशासन अशा उपक्रमांना नेहमीच पाठिंबा देत राहील.पक्ष्यांसाठी पाण्याच्या कुंड्या फक्त पोलीस स्टेशनपुरत्या मर्यादित न ठेवता शहरातील विविध ठिकाणी – उद्याने, शाळा, वसाहती आणि सार्वजनिक ठिकाणीही लवकरच या कुंड्या ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणप्रेमाची भावना वृद्धिंगत होणार असून, अनेकांनी पुढे येऊन यामध्ये सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. स्वच्छता अभियानच्या या स्तुत्य कार्यामुळे शहरात सकारात्मक पर्यावरण जनजागृती होत आहे.