कर्जमाफीसाठी शेतकरी उच्च न्यायालयात धाव घेणार ; अन्नत्याग आंदोलनात निर्धार...!

 


 मूर्तिजापूर - कर्जमाफी संदर्भात निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलेल्या मुख्यमंत्र्यांना आठवण करून देण्यासाठी आता उच्च न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार अन्नत्याग आंदोलनात उपस्थित शेतकऱ्यांनी मूर्तिजापूर वकील संघाच्या मदतीने केला.

      प्रगती शेतकरी मंडळ मूर्तिजापूर, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनमंच नागपूर, आंतरभारती पुणे, न्यू यंग क्लब , फार्मर्स ग्रुप, यंग बॉईज क्लब मूर्तिजापूर वतीने अन्नत्याग आंदोलनाचे आयोजन तहसील समोर मूर्तिजापूर येथे करण्यात आले होते. मूर्तिजापूर वकील संघाचे अध्यक्ष, ॲड. दिलीप देशमुख, सचिव ॲड. पंकज जामनिक व इतर पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळी भेट देऊन आम्ही शेतकऱ्यांसोबतच असून तुमची कर्जमाफीची याचिका आम्ही उच्च न्यायालयात दाखल करून लढू अशा ठाम भूमिकेची आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला.



      यावेळी ॲड.राधिका काळे, ॲड.स्वाती राजुरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून आम्ही आपल्या पाठीशी आहोत असा दिलासा दिला. तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी या चिंतन बैठकीला उपस्थित राहून आत्महत्याग्रस्त शेतकरी स्व.साहेबराव करपे यांच्या स्मृतिदिनी अन्नत्याग आंदोलन करून श्रद्धांजली अर्पण केली. 

     शेतकरी पूरक कायदे , हमीभावाचा कायदा करून आत्महत्याचे कालचक्र थांबवण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post