१ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन : उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन
जिल्हा प्रतिनिधी,श्रीकांत राऊत यवतमाळ
महागाव :-राज्यात स्मार्ट विद्युत मीटर लावण्यात येत असून, मीटर रीडिंग घेणारे कंत्राटी कामगार आणि वीज बिल वाटप कंत्राटी कामगारांवर यामुळे बेरोजगारीचे संकट येणार आहे. मीटर रीडर आणि विज बिल वाटप कामगारांसोबत शासन आणि महावितरण कंपनीने चर्चेला बसावे, त्यानंतरच पुढचा निर्णय घ्यावा या मागणीसाठी एमएसईडीसीएल मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेने एल्गार पुकारला आहे. संघटनेचे सर्व पदाधिकारी व कामगारांनी १ फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेच्या महागाव तालुका शाखेच्या वतीने आज एक निवेदन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना देण्यात आले. राज्यात फॉल्टी मीटरच्या जागी स्मार्ट मीटर (प्रीपेड मीटर) लावण्यात येत आहेत. मीटर मध्ये जोपर्यंत बॅलन्स आहे तोपर्यंत ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू राहील व बॅलेन्स संपताच विद्युत पुरवठा बंद होईल. स्मार्ट मीटर लावण्यास संघटनेचा विरोध नाही परंतु त्यांच्या मागण्यांवर सरकारने व महावितरणने चर्चेसाठी पुढे यावे अशी मागणी आहे. शेवटचा पर्याय म्हणून संघटनेने काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरण कंपनीने शासन स्तरावर चर्चा करून मीटर रीडर आणि विज बिल वाटप कामगारांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्याचा ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहील असा इशारा महागाव तालुका शाखेचे अरविंद ढगे, राहुल ढगे, सुदाम गायकवाड, नामदेव गोस्वामी, विलास खिरे, कपिल खंदारे, मुदस्सर शेख, सुभाष इंगळे, यांनी दिला आहे.
६० वर्षापर्यंत कामाची हमी द्यावी;
मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेने यापूर्वीही अनेकदा याच प्रश्नावर उपोषणाचे हत्यार उपसले आहे, तसेच अनेक वेळा निवेदनेही दिली आहेत. प्रीपेड मीटर लागल्यानंतरही शासनाने मीटर रीडर कामगारांना ६० वर्षापर्यंत कामाची हमी द्यावी ही मुख्य मागणी आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात याच मुद्द्यावर मीटर रीडर संघटनेने आंदोलन केले होते, तेव्हा ऊर्जा सचिवांनी संघटनेसोबत शिखर बैठक घेऊन चर्चेद्वारे हा प्रश्न सोडविण्याची हमी दिली होती, परंतु आता एक महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही चर्चेसाठी कोणीही पुढे आलेली नाही.