निकृष्ट बियाणे विक्रीप्रकरणी कठोर कारवाईची मागणी; तहसीलदारांना निवेदन
मालेगाव | प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यात निकृष्ट व उगवण न झालेल्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याने मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कृषी सेवा केंद्रे व बियाणे उत्पादक कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत तहसीलदार, मालेगाव यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांवर अचानक धाडी टाकून बियाण्यांचे नमुने जप्त करून तपासणी करावी, बोगस अथवा निकृष्ट बियाणे विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करावेत, तसेच संबंधित कंपनी व विक्रेत्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, निकृष्ट बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात तात्काळ पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई द्यावी आणि शासनामार्फत अनुदानित दरात दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांवर आत्महत्येसारखी टोकाची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
यावेळी मालेगाव तालुका अध्यक्ष गौतम सुर्वे, जिल्हा महासचिव जावेद खा पठाण, प्रदेश सचिव शेख रफिक भाई, जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे, तालुका उपाध्यक्ष दिगंबर चंद्रशेखर तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय इंगोले, दत्ता सुर्वे, शुभम वायकर, राजकुमार सुर्वे, विलास पखाले, मोहन खिल्लारे, गुलाब किल्लारी, पिराजी गायकवाड, मनीष ताजन, भारत ठोके, भारत सुर्वे, जनार्दन सुर्वे, सतीश वानखडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


