जव्हारचे लोकनेते आणि 'मर्चंट'चे आधारस्तंभ संदीप भाई वैद्य यांचे दुःखद निधन; जव्हार नगरीवर शोककळा...

 



जव्हार प्रतिनिधी-जितेंद्र मोरघा

जव्हार :जव्हार शहराचे माजी नगराध्यक्ष,मर्चंट को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव,सर्वांचे लाडके संदीप जी वैद्य (संदीप भाई) यांचे अचानक निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने जव्हार तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून,एका सेवाभावी आणि अभ्यासू नेतृत्वाला जव्हार मुकले आहे.

सामाजिक आणि राजकीय प्रवासाचा अंत

संदीप भाई वैद्य यांनी जव्हार नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणून काम करताना शहराच्या विकासात मोलाची भूमिका बजावली होती.केवळ राजकारणच नव्हे,तर समाजकारणातही त्यांचा हातखंडा होता.गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते सदैव तत्पर असत.प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आणि कायद्याची उत्तम जाण असलेल्या संदीप भाईंनी जव्हारच्या सार्वजनिक जीवनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

'मर्चंट'पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक क्रांती

सहकार क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य ऐतिहासिक मानले जाते. 'मर्चंट (को-ऑपरेटिव्ह) पतसंस्थे'ची स्थापना करून त्यांनी जव्हारमधील व्यापारी, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांना हक्काचे आर्थिक व्यासपीठ मिळवून दिले.त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज ही संस्था एक वटवृक्ष बनली असून,अनेक कुटुंबांना त्याचा आधार मिळाला आहे.

कायद्याच्या चौकटीत राहून समाजहित

संदीप भाईंचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य नियम आणि कायद्याच्या चौकटीत राहून समाजसेवेसाठी वेचले. कोणत्याही गुंतागुंतीच्या विषयात कायदेशीर मार्ग काढून जनतेला न्याय कसा मिळेल, याकडे त्यांचा नेहमी कटाक्ष असे.त्यांच्या निधनाने जव्हारच्या सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातील एक मार्गदर्शक हरपला आहे.

सर्वस्तरातून श्रद्धांजली

त्यांच्या निधनाची बातमी समजताच जव्हार शहरात शोककळा पसरली असून व्यापारी प्रतिष्ठाने व सामाजिक संस्थांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे."एक दिलदार मित्र आणि मार्गदर्शक हरपला,"अशा भावना जव्हारच्या नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post