मुगलाई प्रभागात पाणीटंचाई तीव्र — नागरिकांना केवळ ५ ते १० मिनिटांची जलपुरवठा

 


८ दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा, आंदोलनाचा इशारा


 परतवाडा | प्रतिनिधी

परतवाडा शहरातील मुगलाई प्रभागात पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मागील ८ दिवसांपासून परिसरात नियमित पाणीपुरवठा होत नसून, ज्या भागात पाणी येत आहे तेथेही केवळ ५ ते १० मिनिटांसाठीच पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

भीषण उन्हाळ्याच्या काळात एवढ्या कमी वेळेच्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होत नाहीत. पिण्याच्या पाण्यापासून घरगुती वापरापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. अनेक कुटुंबांवर महागड्या दराने टँकर मागवण्याची वेळ आली आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, त्यांनी अनेकदा संबंधित विभागाकडे या समस्येबाबत तक्रारी केल्या, मात्र अद्याप कोणताही कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नाही. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असून, मर्यादित वेळेत पाणी भरण्यासाठी त्यांना लांबच लांब रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे.

संतप्त नागरिकांनी इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्यात आला नाही, तर ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.

आता प्रशासन या गंभीर समस्येकडे किती गांभीर्याने लक्ष देते आणि मुगलाई प्रभागातील नागरिकांना कधी दिलासा मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post