शहीद दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना अभिवादन; महाड चवदार तळे ते संविधान पत्रकाचे वाटप
अमरावती : शहीद दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाला अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात सामाजिक समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा संदेश देण्यात आला.
या प्रसंगी उपस्थितांनी शहीदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांच्या देशासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांवर चालण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान “महाड चवदार तळे ते संविधान” या विषयावरील माहितीपर पत्रक नागरिकांना वाटप करण्यात आले. या पत्रकातून महाडच्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहापासून भारतीय संविधान निर्मितीपर्यंतच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याची माहिती देण्यात आली.
यावेळी उपस्थितांनी सामाजिक समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संविधानिक मूल्ये समाजात रुजविण्यासाठी सातत्याने जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमात विविध सामाजिक कार्यकर्ते व समविचारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या कार्यक्रमाला मो. अफसर भाई, विजय डवरे, प्रफुल्ल मंदा श्रीधर, मनीष गवई, विजय गायकवाड, संदीप यादव, प्रवीण वासनिक, गणेश गहुकर, सुनील रामटेके, प्रा. डॉ. संजय खडसे, आशिष देशमुख, श्री. हिवराळे, शुभम दमाहे, दिगंबर मेश्राम, सचिन खोब्रागडे, नितीन गायकी आदी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महा. अनिस) चे सर्व साथी, संविधान जागरचे साथी व विविध समविचारी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून शहीदांच्या बलिदानाची आठवण ठेवत समाजात समता, बंधुता व संविधानिक मूल्ये रुजविण्याचा संदेश देण्यात आला.
