पावसाळ्यातील आहार आणि आरोग्य

 

Anjali Dahat


 तीव्र उन्हात उन्हाच्या झळा सोसताना प्रत्येक जण हा अल्हाददायक अशा पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि अशातच मान्सूनला सुरुवात होते चार महिन्याच्या कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा हा स्वागतार्ह बदल आहे. परंतु मान्सून उष्णतेपासून दिलासा देत असताना तो जोखमी सह येतो या ऋतुतील तापमान आणि आद्रता जिवाणू आणि बुरशीच्या वाढीसाठी पोषक असतात. काही रोगांचा प्रादुर्भाव या ऋतूत जास्त होतो म्हणूनच पावसाचा परिपूर्ण आनंद घेण्यासाठी आहार व स्वच्छतेबाबत विशेष काळजी घ्यायला हवी. पावसाळ्याच्या दिवसात कॉलरा, डायरिया, टायफॉईड, गॅस्ट्रो, कावीळ यासारखे जलजन्य आजार होण्याची जास्त संभावना असते, त्यामुळे सर्वात महत्त्वाचे पिण्याच्या पाण्याची विशेषतः काळजी घ्यायला हवी. या दिवसात फक्त फिल्टर केलेले पाणी किंवा उकळलेले पाणी प्यायला पाहिजे. उकळलेले पाणी 24 तासाच्या आत वापरायला हवे. खात्रीचे ठिकाण जसे घर, ऑफिस येथील पाणी प्यावे. बाहेर पाणी प्यायचे झाल्यास नारळ पाणी, मिनरल वॉटर प्यावे तुमची पाण्याची तहान कोल्ड्रिंक वर भागवू नका. ऋतू कोणताही असो स्वतःला हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. ‌ जेवण करण्यात आणि पचविण्यात जठराची मुख्य भूमिका असते. पावसाळ्यात जठराग्नी मंद होतो म्हणूनच या काळात जास्त खाल्ल्यास ते नीट पचत नाही. वातावरणात विशेषता वनस्पती,धान्य,पाणी इत्यादी सर्वच ठिकाणी आम्लता वाढत असल्याने पित्त साचण्याकडे शरीराचा कल असतो म्हणूनच पावसाळ्यात पचना संदर्भातील आजार होऊ नये यासाठी आहार काळजीपूर्वक घेतला पाहिजे. या ऋतूनुसार हवामानात होणारे बदल आणि शरीरात होणारे बदल लक्षात घेऊन आहारात बदल करणे आवश्यक आहे. जड अन्नपदार्थ टाळावे. ताजा, स्वच्छ, हलका, पचनास योग्य असाच आहार घ्यावा. या ऋतूतील वातावरण बॅक्टेरियाच्या वाढीसाठी अनुकूल असते त्यामुळे बाहेरचे उघड्यावरील भेळ, पाणीपुरी यासारखे पदार्थ, माशा बसलेले दूषित अन्न, शिळे पदार्थ, अर्धवट शिजलेले अन्न पावसाळ्यात खाणे टाळावे.



 तळलेले पदार्थ पचनास जड व पित्त वाढवणारे असल्याने असे पदार्थ जास्त खाऊ नये असले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने अपचनासह गॅस्ट्रो इंटेसटायनल आजार होऊ शकतात.

 प्रवासात वडा समोसा असले प्रकार खाण्यापेक्षा चिक्की, खाकरा, चिवडा किंवा केळीसारखे एखादे फळ खावे, बाहेरील उघड्यावरील कापलेली फळे, भाज्या, सलाद खाऊ नये. या ऋतूत कच्च्या भाज्यांपेक्षा वाफवलेल्या भाज्यांना जास्त प्राधान्य द्यावे. एका दिवसापेक्षा जास्त दिवसापूर्वीचे अंकुरित कडधान्य वापरू नये. मूग, मसूर अशी कडधान्य पचायला हलकी असतात त्यामुळे ती खावीत चवळी, वटाणा, पावटा अशी धान्य जास्त खाऊ नये. मशरूम वापरू नये. कोहळ, दुधी, पडवळ, तोंडली, कारली इत्यादी भाज्या वापराव्यात. डाळिंब, केळी, सफरचंद, नाशपती इत्यादी फळ खाऊ शकता. भाज्या कापण्या आधी मीठ किंवा खाण्याचा सोडा किंवा विनेगरच्या पाण्यात पंधरा-वीस मिनिटे बुडवून ठेवाव्या व नंतर स्वच्छ वाहत्या पाण्याखाली धुवून वापराव्यात. मास शिजवताना मसाले युक्त ग्रेव्हीच्या स्वरूपात न करता सूपच्या स्वरूपात त्याचे सेवन करावे. अर्धवट शिजलेले मास खाऊ नये. ताजं अन्न खावं शीळ अन्न खाऊ नये. सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ झाकून ठेवावे. दूध व दुधाचे दुधाचे पदार्थ प्रमाणात खावे. ताज दही व ताकाचे सेवन करू शकता. ज्यांचा आहार संतुलित नाही, फळे, भाज्यांचा अभाव, प्रथिनांची कमतरता असेल तर त्यांना जंतू संसर्ग लगेच होतो कारण त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असते. या काळात सर्दी पडसे यासारखे आजार होतात म्हणून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी 'क' जीवनसत्त्वयुक्त लिंबू वर्गीय फळांचा आहारात समावेश करावा. या काळात तुम्ही ग्रीन टी, ब्लॅक टी, लेमन टी असली हर्बल पेय घेऊ शकता. ती तयार करताना त्यामध्ये लवंग, मिरे, आलं, पुदिना, तुळशी, गवती चहा चा वापर करू शकता. मसाल्यामध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीइन्फ्लामेटरी गुणधर्म असतात त्यामुळे आहारात आलं, लसूण, मिरे, हिंग, जिरे, धने, मेथी इत्यादी मसाल्याचा आवर्जून वापर करावा. स्वयंपाक घरातील सोनेरी मसाला म्हणून ओळखली जाणारी हळदी मध्ये अँटीसेप्टिक, अँटी फंगल, अँटीमाइक्रोबियल, अंटीबॅक्टेरियल आणि अँटिइनफ्लामेटरी गुणधर्म असतात म्हणूनच हळद नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढवते. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन या घटकाच्या शोषणासाठी मिरी मध्ये असलेले पाईपरीन हे मदत करत असते म्हणूनच हळदी सोबत मिरपूड वापरावी. ताज अन्न खावं शीळ अन्न खाऊ नये. सर्व खाद्यपदार्थ झाकून ठेवावे. स्वयंपाक गृहाची स्वच्छता बाळगताना किचन आद्र न राहता स्वच्छ कोरडे कसे राहील याची काळजी घ्यावी. किचन सिंक उकळत्या पाण्यात दोन चमचे मीठ घालून धुवून घ्यावे. फ्रीज स्वच्छ ठेवावे. जेवण झाल्या झाल्या भांडी घासून घ्यावी. आहारासोबतच स्वच्छतेबाबत ही जागृत असणे आवश्यक आहे अशा प्रकारे काळजी घेतल्यास तुम्ही अल्लाददायक अशा पावसाचा मनमुराद आनंद लुटू शकता.


Anjali Dahat

              अंजली दहात, आहार तज्ञ 

          जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती





Post a Comment

Previous Post Next Post