किनवट - तालुक्यातील १३४ पैकी १०२ ग्रामपंचायतींच्या सन २०२५ ते २०३० या पाच वर्षासाठीचे सरपंचपदाचे आरक्षण शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात सहायक जिल्हाधिकारी तथा नियंत्रण अधिकारी झेनिथचंद्र दोन्थुला व तहसीलदार तथा प्राधिकृत अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर यांच्या उपस्थितीत चिठ्ठीने काढण्यात आले.
किनवट तालुक्यातील रिठा, मानसिंग नाईक तांडा, पांगरपहाड, शिवणी, दीपला नाईक तांडा, मोहाडा, बुधवारपेठ, रोडा नाईक तांडा, मलकजाम, कोसमेट या ग्राम पंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहे. तर मरकागुडा, मारलागुडा, मुळझरा, जरुर तांडा, मलकजाम तांडा, दयालधानोरा, तोटंबा, अंबाडी तांडा, गोंडेमहागाव व भिशी या ग्रामपंचायती सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहेत. वाळकी बु. अनुसूचित जाती, अप्पारावपेठ, इरेगाव, चिखली इ. अनुसूचित जाती महिला, इस्लापूर, नंदगाव तांडा, फुलेनगर, आंदबोरी इ. नागरिकांचा मागास प्रवर्ग, कंचली, नंदगाव, गोंडजेवली, पांगरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, तर गोकुंदा, मदनापूर, शनिवारपेठ, राजगड, मांडवा, अंबाडी अशा ५१ ग्राम पंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी, पार्डी, बोधडी बु.,चिखली, नागझरी, मलकवाडी अशा ५१ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपद अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित आहे. स्पृहा रोडे या विद्यार्थिनीने सोडतीच्या चिठ्या काढल्या. आरक्षण कुणाला सुटणार या उत्सुकतेपोटी भावी सरपंचांनी समर्थकांसह हजेरी लावली होती. आरक्षण जाहीर झाल्यानंतर कहीं खुशी कहीं गम अशी चर्चा होती.