गंगापूर : गंगापूर पंचायत समिती मध्ये गट विकास अधिकारी सुहास वाघचौरे यांच्या नेतृत्वाखालील बोगस कामांच्या विरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते भगवान बनकर यांच्यावर १० फेब्रुवारी २०२५ रोजी प्राणघातक हल्ला झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगापूर तालुक्यातील पाच सर्कलच्या चौकशीदरम्यान दलित वस्ती सुधारणा, पाणंद रस्ते, नरेगा, शेततळे, फळबाग, गायगोठे, १४ वा वित्त आयोग, १५ वा वित्त आयोग, जल जीवन मिशन अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघडकीस आला आहे.
विशेषतः ग्रामसेवक आणि गट विकास अधिकारी यांच्या संयुक्त खात्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार आढळले आहेत.भगवान बनकर यांनी या भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि संभाव्य घातपाताची शक्यता वर्तवली होती.
त्यांच्या म्हणण्यानुसार, गट विकास अधिकारी सुहास वाघचौरे यांनी ठेकेदारांकडून आर्थिक देवाणघेवाण करून तीन हजार संचिकांची अपूर्ण कागदोपत्री कामे लपविण्याचा प्रयत्न केला आहे."
बनकर यांनी संबंधित मारेकरी, ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, चौकशी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर हल्ल्याचा आरोप केला आहे.
भगवान बनकर यांनी मागणी केली आहे की, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईपर्यंत गंगापूर पंचायत समितीची कामे आणि बोगस बिले थांबवावीत.
अन्यथा ते ग्रामीण आयुक्त कार्यालय औरंगाबाद समोर आत्मदहन करतील. ज्यासाठी भ्रष्टाचारी अधिकारी जबाबदार असतील.