किनवट –: ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या ‘जलजीवन मिशन’ योजनेला निधीअभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तालुक्यात सुरू असलेल्या विविध कामांसाठी अंदाजे ४० ते ४५ कोटी रुपयांची आवश्यकता असून, निधी मिळत नसल्याने अनेक पाणीपुरवठा प्रकल्प अर्धवट अवस्थेतच थांबले आहेत.
तालुक्यात मंजूर ११२ कामांपैकी केवळ ४७ कामे ७५ ते १०० टक्के पूर्ण झाली आहेत, तर ३४ कामे ५० ते ७५ टक्के, २३ कामे २५ ते ५० टक्के आणि ९ कामे फक्त २५ टक्केच पूर्ण झाली आहेत. अनेक ठिकाणी निधीअभावी कामे रखडली असून, त्यामुळे नागरिकांना अद्याप शुद्ध पाणी मिळण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
काही गुत्तेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले असून, ३८ गुत्तेदारांना प्रतिदिन ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तरीही, निधी मिळत नसल्याने अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नाही.
‘हर घर जल’ उपक्रमांतर्गत २०२५ पर्यंत प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्याअंतर्गत विहिरी, विंधन विहिरी, जलसाठवण टाक्या, नळयोजना व पाणी वितरण व्यवस्था उभारणे ही महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली होती. परंतु निधीअभावी अनेक योजना रखडल्या आहेत.
गुत्तेदाराशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संपूर्ण एक वर्ष झाले तरी निधी मिळालेला नाही, त्यामुळे पुढील कामे करणे शक्य होत नाही. शासनाने निधी वेळेत उपलब्ध करून दिल्यास कामे गतीने पूर्ण करता येतील, असे त्यांचे म्हणणे आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये नळयोजना कार्यान्वित झाल्या नसल्याने नागरिकांना अद्याप पाण्यासाठी तरसावे लागत आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर ही परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे.
मार्च २०२५ पर्यंत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
पाणीपुरवठा विभागाने उर्वरित कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, निधी मिळाल्याशिवाय हे उद्दिष्ट पूर्ण करणे अवघड असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून दिल्यास तालुक्यातील नागरिकांना वेळेत पाणीपुरवठा शक्य होईल.