जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर
अमरावती : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक व लोकशाही जनक्रांतीचे आद्य प्रवर्तक होते अशा आशयाचे उद्गार डॉक्टर सतीश तराळ यांनी काढले
महात्मा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते .महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती जिल्हा व शहर शाखा यांच्या वतीने गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट राधा नगर अमरावती येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विचारप्रबोधना सोबत, गीतगायन, चित्र प्रदर्शनी तसेच पत्रक विमोचन करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. हरीश पेटकर (राज्य कार्यवाह, महा. अनिस संशोधन विभाग) मा. श्रीधर डहाके (कार्याध्यक्ष गुरुदेव सेवाश्रम, राधा नगर) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मा. नरेंद्र धर्माळे (जिल्हा कार्यवाह, वैज्ञानिक जाणीवा विभाग), नजमा काझी (सामाजिक कार्यकर्त्या), सुभाष गौरखेडे (जिल्हा प्रधानसचिव, महा. अनिस), तसेच रवींद्र फुले (शहर कार्याध्यक्ष, महा. अनिस, अमरावती शहर) उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या भाषणातून ज्योतिबा फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला व समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकनिष्ठ विचार आणि संविधान मूल्यांची जोपासना करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि अवैज्ञानिक प्रवृत्तीविरोधात जागृती होणे ही काळाची गरज असून तीच महात्मा फुले यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन केले.
मान्यवरांनी गीतगायन व मनोगताच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला. यामध्ये वि. दा. पवार, मो. अफसर, पुंडलिक गोसावी, मयूर विघे, विजय डवरे, मंजू वासनिक, कल्पना कडू, नरेंद्र धर्माळे, संदीप यादव, अर्चना गोसावी, सचिन खोब्रागडे, संदीप हिवराळे, नजमा काझी आदींचा सहभाग लक्षणीय ठरला.
यावेळी महात्मा फुले, समता चळवळ, चवदार तळे सत्याग्रह, अंधश्रद्धा निर्मूलन आणि संविधान मूल्यांवर आधारित प्रबोधनात्मक प्रदर्शनीने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. तसेच पत्रकांचे विमोचन करून त्याचे वाटपही करण्यात आले.
कार्यक्रमाला श्रीराम खापरे, बाळासाहेब महल्ले, संजयराव तायवाडे, राजेश तालन, मधुकरराव केचे यांच्यासह मोठ्या संख्येने युवक-युवती, महिला व नागरिक उपस्थित होते.
हा कार्यक्रम गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, संविधान जागर अभियान (अमरावती), क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन, आम्ही भारताचे लोक अभियान (अमरावती), सुदामकाका देशमुख विचार मंच आणि शिक्षण बचाव समन्वय समिती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे संचालन वर्षा गावंडे (शहर प्रधान सचिव, महा. अनिस, अमरावती शहर) यांनी केले, तर प्रास्ताविक प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी केले. शेवटी रवींद्र फुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
“समता, विज्ञाननिष्ठा आणि संविधान” या मूल्यांचा प्रभावी संदेश देणारा हा कार्यक्रम समाजप्रबोधनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.
