माहेरचा अती हस्तक्षेप; मुलींच्या सुखी संसारात विघ्न येऊन घटस्फोटात वाढ

 





समाजात विवाह ही केवळ दोन व्यक्तींमधील नव्हे, तर दोन कुटुंबांमधील नाती जोडणारी संस्था मानली जाते. मात्र, बदलत्या सामाजिक परिस्थितीत पती-पत्नीमधील विसंवाद आणि तणाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलीच्या माहेरकडील मंडळींचा हस्तक्षेप. अनेकदा हे हस्तक्षेप संयमाने व समजुतीने होण्याऐवजी मतभेद अधिक वाढवणारे ठरतात व प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी बाहेरच्या मंडळी कडून होणारी लुडबुड त्यामुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे.

विवाहाच्या सुरुवातीच्या काळात पती-पत्नी एकमेकांना समजून घेत असताना काही गोष्टींमध्ये मतभेद होऊ शकतात. हे मतभेद सोडवण्यासाठी समजूतदारपणा आणि संयम आवश्यक असतो. मात्र, काही वेळा माहेरच्यांच्या सल्ल्यामुळे किंवा हस्तक्षेपामुळे हे छोटे मतभेद मोठ्या संघर्षात बदलतात.

माहेर कडील मंडळी आपल्या मुलीचे आती लाड करतात. काही पालकांना आपल्या मुलीचे विवाहानंतरचे जीवन सुरळीत चालू आहे की नाही, याची सतत चिंता असते. त्यामुळे ते छोट्या-छोट्या गोष्टींमध्येही हस्तक्षेप करतात.

 माहेरच्या लोकांना वाटते की त्यांची मुलगी व आपला जावई आपल्या नियंत्रणाखाली असावें. त्यामुळे पती किंवा सासरच्या मंडळींवर कारण नसताना अनावश्यक दबाव टाकला जातो.



आर्थिक व्यवहार करत असताना माहेरच्या मंडळीकडून काही वेळा दखलदारी केली जाते. काही कुटुंबे आर्थिक मदतीच्या नावाखाली किंवा सल्ल्याच्या रूपाने सतत हस्तक्षेप करतात. माहेर आणि सासर दोन्ही कडील राहणीमान व जीवनशली वेगवेगळ्या असल्यामुळे काही वेळा मुलीचे माहेर आणि सासर यांच्या परंपरा राहणीमान वेगळ्या असतात. माहेरच्यांना वाटते की त्यांची पद्धतच योग्य आहे आणि त्यानुसारच विवाह टिकावा. सततच्या हस्तक्षेपामुळे पती-पत्नींमध्ये गैरसमज वाढतात आणि त्यांचे स्वतंत्र विचार करण्याचे स्वातंत्र्य हरवते.

सासरच्या मंडळींना वाटते की विवाहितेला तिचे माहेरच्यांकडून पाठिंबा असल्यामुळे ती सासरी सामंजस्याने न राहता मनमानी करते. नातेसंबंध टिकवण्यासाठी आवश्यक असलेला समन्वय कमी होतो आणि वैवाहिक जीवन तणावग्रस्त होते.

काही वेळा मुलगी किंवा तिचे माहेरचे लोक एखाद्या छोट्या गोष्टीवरून मोठा निर्णय घेण्यास प्रवृत्त करतात, ज्यामुळे घटस्फोटाची शक्यता वाढते.


पुढील प्रमाणे उपाययोजना केल्यास परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.....

पती-पत्नीने आपला सुखी संसाराचा गाडा हाकत असताना स्वावलंबी होणे अत्यंत गरजेचे आहे. विवाहानंतर पती-पत्नींनी एकमेकांशी संवाद साधून स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहायला हवे.

माहेरकडील मंडळींनी मुलीच्या संसारात हस्तक्षेप करून निर्णय न घेता अत्यधिक हस्तक्षेप टाळून विवाहातील प्रश्न पती-पत्नींनीच सोडवू द्यावेत. मुलीच्या माहेरकडील मंडळींनी सुखी संसारात हत्ती सल्ला देण्याच्या भानगडीत न पडता सल्ला देताना तो केवळ सकारात्मक आणि दोन्ही बाजूंना समजून घेणारा असावा. संसारामध्ये छोटे-मोठे वाद उद्भवल्यास समोपदेशनाद्वारे काही वेळा तटस्थ तृतीय पक्ष यांचा सल्ला घेतल्यास विवाह वाचवता येतो.

मुलीच्या माहेरकडील मंडळींनी योग्य वेळी योग्य हस्तक्षेप करणे आवश्यक आहे, पण तो नातेसंबंध बिघडवणारा नको. विवाह टिकवण्यासाठी पती-पत्नींनी एकमेकांशी मोकळा संवाद ठेवायला हवा. सासर-माहेर यांच्यात समन्वय साधला, तर विवाह अधिक सुदृढ आणि दीर्घकाळ टिकणारा ठरवून सुखी संसारात सौख्य नांदण्यास मदत होईल.




Post a Comment

Previous Post Next Post